
जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा एकदा वादळी-वा-यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे कळंब तालुक्यासारख्या भीषण दुष्काळी भागात मंगळवारी पाणीच पाणी झाले होते.
उस्मानाबाद- जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा एकदा वादळी-वा-यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे कळंब तालुक्यासारख्या भीषण दुष्काळी भागात मंगळवारी पाणीच पाणी झाले होते. तर वादळी-वा-यामुळे झाडेही कोसळल्याचे चित्र दिसत होते. दरम्यान, भुसावळमध्ये वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
मंगळवारी दिवसभर कडाक्याच्या उन्हानंतर दुपारी चार ते साडेचार वाजेदरम्यान तामलवाडी, अचलेर, परडय़ांसह लोहा-याच्या काही भागात अवकाळी पाऊस झाला. वादळी वा-यामुळे काही ठिकाणच्या शाळांवरील पत्रे उडाले असून विद्युत ताराही तुटल्या होत्या. तर बेंडकाळ येथे वीज पडून म्हैस दगावली.
उन्हामुळे सकाळी नऊ वाजल्यापासूनच घराच्या बाहेर पडणे कठीण होते. दुपाच्या सुमारास तर मुख्य रस्त्यांवरही शुकशुकाट असतो. अशात मंगळवारी दुपारी मात्र ढगाळ वातावरण निर्माण होऊन वातावरणातील उकाडा कमी झाला. त्यानंतर चार वाजेच्या सुमारास जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांत वादळी वा-यासह पावसाच्या सरी बरसल्या. लोहारा तालुक्यातील बेंडकाळ येथील शकुंतला जगन्नाथ गोरे यांच्या शेतातील झाडावर वीज पडली.
या घटनेत झाडाखाली बांधलेली म्हैस जागीच ठार झाली. त्याचप्रमाणे अचलेर परिसरातही जवळपास अर्धातास पावसाच्या सरी बरसल्या. वादळी वा-यामुळे जिल्हा परिषद शाळेवरील तसेच कुंभार वस्तीतील काही जणांच्या घरावरील पत्रे उडाले. त्याचप्रमाणे अचलेर शिवारातील विद्युतवाहक ताराही तुटल्या.
त्यामुळे विद्युतपुरवठा खंडित झाला. दरम्यान, बोरगाव, सलगरा, आलूर येथेही पावसाच्या सरी कोसळल्या. नळदुर्ग परिसरातही साधारणपणे साडेचार वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तुळजापूर शहरासह अणदूर परिसरातही पाऊस झाला. येणेगूर येथेही रिमझिम पाऊस पडला.